Wednesday, January 17, 2018

मून अँड सिक्सपेन्स - 3

हे झाले थोडेसे विषयांतर.
मी माझं पहिलं पुस्तक लिहीलं तेव्हा मी अगदी तरूण होतो.
सुदैवाने माझ्या पहिल्याच पुस्तकाकडे लोकांचं लक्ष गेलं आणि बरेच लोक मला ओळखू लागले.
लंडनच्या साहित्यिक वर्तुळात माझी उठबस सुरू झाली. माझा स्वभाव थोडासा उतावीळपणाचा असला तरी सुरवातीला भिडस्तपणामुळे मी मागेमागेच रहायचो. माझ्या भटकंतीच्या दिवसात सगळा आनंदी आनंद होता असं काही म्हणता येणार नाही. काही अगदी मन विषण्ण करणारे प्रसंगही येत. पण त्याला आता खूप काळ लोटला आहे. कादंबर्यांत वर्णन केलेल्या गोष्टी आणि घटना बर्याच अंशी अचूक असल्या तरी काळानुसार त्यातील काही तपशील आता बदलले आहेत. उदाहरणार्थ काही स्थळं. चेल्सी आणि ब्लुम्सबेरीने आता हॅम्पस्टीड, नॉटींग हिल गेट, हाय स्ट्रीट आणि केनिंगस्टनची जागा घेतली आहे. त्या काळी एखाद्याचा चाळीशीच्या आत साहित्यिक वर्तूळात समावेश होणं म्हणजे मोठा बहुमान समजला जायचा. पण आता पंचवीस वर्षावरील साहित्यिकाला अडगळीत काढलं जातं. त्या काळी आम्ही आमच्या भावनांचं प्रदर्शन करायला थोडे लाजायचो. आपली चेष्टा हाईल या भितीमुळे का होईना आमचा ढोंगीपणा थोडा काबूमध्ये असायचा. आम्ही फार सोज्वळ होतो अशातला भाग नाही, पण आजच्यासारखा चौफेर स्वैराचर मात्र आमच्या काळी नव्हता. क्वचित कधीतरी पाऊल वाकडं पडलं तर त्याची वाच्यता करण्याऐवजी आम्ही मौन बाळळगत असू. आम्ही फावड्याला फावडं म्हणणारी अगदी सरळसोट माणसं होतो. स्त्रियांनी त्यांची मर्यादा त्याकाळी ओलांडली नव्हती हे ही एक महत्वाचं कारण होतंच म्हणा.
मी व्हिक्टोरिया स्टेशनजवळ रहात असे. तेथून मी माझ्या साहित्यिक मित्र मंडळींना भेटण्यासाठी बसने शहरात ठिकठिकाणी जात असे. अशा माझ्या भटकंतीतील एक भेट मला आजही नीट आठवत आहे. भिडस्तपणामुळे मला दार ठोठावण्याचा धीर होत नव्हता. त्यामुळे धीर येण्यासाठी मी रस्त्यावरून फेर्या मारत होतो. अशा बर्याच फेर्या मारून झाल्यावर शेवटी धीर करून मी दार ठोठावले. दार उघडून कोणीतरी मला आत घेतल्यावरच माझा जीव भांड्यात पडला. आतल्या गर्दीत मी बुजर्यासारखा वावरत होतो. तेथे यजनामीण बाईंनी बर्याच मोठ्या लोकांशी माझी आवर्जून ओळख करून दिली. त्यांनी माझ्या पुस्तकाची जी स्तुती केली त्याने तर मी पार अवघडून गेलो होतो. मी लेखक असल्याने संभाषण चतुर असेन असं त्यांना वाटत असावं. पण बोलायला चातुर्यपूर्ण असं काहीतरी सुचेपर्यंत पार्टी संपून गेली होती. माझा अस्वस्थपणा लपवण्यासाठी मी चहाचा कप आणि पावाचा कसातरी कापलेला तुकडा हातात घट्ट धरून उभा होतो. माझ्याकडे कोणाचेही लक्ष जाऊ नये असं मला वारंवार वाटत होतं. कारण मला त्या सगळ्या सुप्रसिद्ध मंडळींकडे डोळे भरून पहायचं होतं आणि त्यांचं चातुर्यपुर्ण बोलणं माझ्या कानात साठवून घ्यायचं होतं.
तेथे जमलेल्या स्त्रिया नाकेल्या, टपोर्या डोळ्यांच्या आणि चांगल्या धष्टपुष्ट होत्या. त्यांनी घातलेले कपडे अंगावर घातलेल्या चिलखतासारखे दिसत होते. हळू आवाजात बोलत इकडे तिकडे फिरताना आपल्या अवतीभोवती काय चालंलय याच्यावर त्यांचं बारीक लक्ष होतं. पावाला लोणी लावतानासुद्धा हातमोजे न काढण्याचा हट्ट आणि कोणाचं लक्ष नाही असं पाहून हळूच खुर्चीला हात पुसण्याची चलाखी माझ्या अजूनही लक्षात आहे. फर्नीचरच्या दृष्टीने तसं करणं चांगलं नव्हतं पण यजनानीणबाईंनी त्याचा बदला त्या जेव्हा त्यांच्या मैत्रीणीकडे पार्टीला जातील तेव्हा तेथल्या फर्नीचरला हात पुसून घेतला असता. काही जणींनी अद्ययावत फॅशनचे कपडे घातले होते. एखाद्याने कादंबरी लिहीली आहे एवढ्यावरून त्याला गबाळेपणाने रहाण्याचा हक्क मिळतो असे नाही असं त्यांचं मत होतं. छाप पाडण्यासाठी चांगले रूबाबदार कपडे घालायला हरकत नसते. लेखकाने झकपक कपडे करून वर चकचकीत बूट घातले तर त्याचे लिखाण नाकारायची संपादकाची हिम्मत होणार नाही. पण काही स्त्रियांच्या मते व्यवस्थित कपडे केल्याने त्यातून थिल्लरपणा दिसतो. कलाकारासारखे दिसण्यासाठी त्या मुद्दाम गबाळे कपडे करून आल्या होत्या. त्यांनी घातलेले दागिने तर अगदी बघवत नव्हते. पुरूष सहसा असा आचरटपणा करत नाहीत. त्यांचा पहेरावर अगदी कुठल्याही ऑफिसमध्ये खपून जाईल असा होता. बहुतेकजण थकलेले आणि कंटाळलेले दिसत होते. तेथे जमलेल्या लेखक मंडळींपैकी बर्याच जणांशी माझा पूर्वपरिचय नव्हता. त्या तद्दन खोट्या आणि तकलादू वातावरणात मला अगदी अवघडून गेल्या सारखे वाटायला लागलं.

तेथे जमलेल्या मंडळींच संभाषण ऐकण्यासारखं होतं. कोणाची पाठ वळताच त्याची खिल्ली उडवली जायची. एखाद्या व्यक्तिच्या चारित्र्याची टिंगल उडवावी तशाच थिल्लरपणाने त्याचे गंभीर लेखनसुद्धा टिंगलीचा विषय होऊ शकतो हे मला नव्याने कळलं. मला समयोचित आणि हजरजबाबी बोलता येत नाही याचं मला वाईट वाटतं. त्या काळी संभाषणचातुर्य हे एक मोठं शास्त्र होतं. मार्मिक आणि चपखल उत्तर देणं ही एक कला होती. भट्टीमधील फुटाण्यासारखा ताडताड बोलणारा लेखक पार्टीमध्ये भाव खाऊन जाई. संभाषणात चुटके आणि चारोळ्या पेरून खोटी नाटकी रंगत आणली जाई. आता मला त्यातील फारसं काही आठवत नाही. पण मला वाटतं संभाषण जेव्हा लेखन व्यवसायाच्या प्रमुख अंगाकडे वळायचे तेव्हा कित्येकांना ते अडचणीचं वाटायचं. एखाद्या पुस्तकाच्या गुणवत्तेचा विषय निघाला की त्या पुस्तकाच्या किती प्रति विकल्या गेल्या, लेखकाला किती मानधन देऊ केलं आहे, त्यातील किती त्याला आगाऊ मिळाले, असे प्रश्न हटकून उपस्थित व्हायचे. मग आम्ही या ना त्या प्रकाशकाविषयी बोलत असू. एकाचं औदार्या तर दुसर्याचा कंजूषपणा यांची तुलना व्हायची. घसघशीत मानधन देणार्या प्रकाशकाकडे जावं की चांगल्या दर्जेदार पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेल्याकडे जावं. काही प्रकाशक जाहिरात चांगली करत तर काहींच जाहिरातीकडे पूर्ण दुर्लक्ष. नंतर एजंट आणि संपादकांचा विषय निघायचा. कोणता एजंट एकदा मान्य केलेलं मानधन वेळीच रोख देतो आणि कोणता नुसते वायदे करत बसतो? पुस्तकाचा खप वाढण्यासाठी संपादकांचा तसा उपयोग होतो का? अशा लेखकांच्या आतल्या वर्तुळात आपला समावेश झाल्याबद्दल मला त्यावेळी आतून फार बरं वाटायचं.


Victorian high tea party, Photograph on glass plate, Circa 1900.
Source: Wikipedia, Public Domain

3 comments:

  1. पार्टीचे वर्णन मस्त जमलंय

    ReplyDelete
  2. पार्टीचे वर्णन मस्त जमलंय

    ReplyDelete
  3. तुझ्यासारख्या रसिक मित्रांच्या कॉमेंटमुळे पुढचा भाग पोस्ट करण्याचा उत्साह वाढतो.

    ReplyDelete